1975 ते 77 दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी सत्तेवर असताना राष्ट्रीय आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे अनेक राजकीय नेते कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगवासात ठेवण्यात आले. सामाजिक व राजकीय कारणांनी तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांना पूर्वी दहा हजार रुपये व त्यांच्या वारसांना पाच हजार रुपये एवढं अनुदान मिळायचं.
advertisement
या अनुदानात आता वाढ करण्यात आली आहे. एक महिना पेक्षा जास्त तुरुंगवासात राहिलेल्या नागरिकांना 20000 रुपये मासिक मानधन मिळणार आहे. एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास सहन केलेल्या नागरिकांना दहा हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे.
आणीबाणीमध्ये तुरुंगवास सहन केलेल्या नागरिकांच्या वारसांना एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी 10 हजार तर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी 5000 रुपये एवढं मासिक अनुदान असणार आहे. त्याचबरोबर तुरुंगवासात असताना 18 वर्ष पूर्ण केल्याची अट देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी व लाभार्थींच्या वारसांनी 25 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.






