पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केले. ते दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. पुढील दोन महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार असल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या मुंबई नगरी महापालिकेची आर्थिक उलाढाल पाहता काहीही करून यंदा मुंबई जिंकण्याचे भाजपचे स्वप्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, नव्याने मुंबई अध्यक्ष झालेले अमित साटम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार या सर्वांनीच कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका जिंकण्याची रणनीती बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत ठरेल.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष बैठक बोलावली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवन येथे बैठक बोलावली आहे. मुंबईतील भाजप आमदार आणि खासदारांसोबत पंतप्रधान मोदी बैठकीत संवाद साधणार आहेत. आज रात्री आठ वाजता राजभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी सूक्ष्म रणनीती आखण्यात येईल.
ठाकरे बंधूंना कसे हरवायचे? मोदी भाजप नेत्यांना मार्गदर्शन करणार
उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला यंदा राज ठाकरे आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. शिवाय काँग्रेस आणि तुलनेने दुबळी असलेली पवारांची राष्ट्रवादीही आघाडी म्हणून शिवसेनेच्या साथीला आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसांचा मुद्दा पुढे करून शिवसेनेने भविष्यातील प्रचार कोणत्या दिशेने जाणार आहे, याचे संकेत दिले आहे. शिवसेना पक्षफूट हा मुद्दाही प्रचारात दिसेल. एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना नमविण्यासाठी योग्य समीकरणे जुळवून आणत आणि मराठी-अमराठी मतांचे ध्रुवीकरण घडवून आपले इप्सित साध्य करण्याचे भाजपचे धोरण आहे. मुंबईत केलेल्या विकासकामांचा डंका वाजवून, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून गरज पडल्यास अखेरचा डाव म्हणून उत्तर भारतीय मतांचे गणित लक्षात घेता मतविभाजनाच्या पॅटर्नवर भाजप काम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.