व्यवसायाची सुरुवात
श्रीकांत खरात यांना बारावीनंतरचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे सोडावे लागले. बिकट परिस्थितीमुळे कमी वयातच घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली, त्यामुळे श्रीकांत यांनी इतरांच्या हाताखाली नोकरी करण्यास सुरुवात केली. पगारातून जमा होणाऱ्या पैशांतून घरची परिस्थिती सावरल्यानंतर, नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांनी एक छोटा फूड कॅफे सुरू केला.
advertisement
अपयश आणि पुन्हा प्रयत्न
परंतु व्यवसायाची फारशी कल्पना नसल्यामुळे श्रीकांत यांना त्यांच्या पहिल्या व्यवसायात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. काही काळानंतर कॅफेला अपेक्षेनुसार प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तो बंद केला आणि त्यानंतर रस्सा पोहे विकण्यास सुरुवात केली. या ठिकाणीही बऱ्याच अडचणी आल्या, त्यामुळे त्यांना तो सुद्धा व्यवसाय बंद करावा लागला. परिस्थिती बिकट असल्याने काहीतरी करणे भाग होते. यासाठी त्यांनी पुन्हा इतरांच्या हाताखाली कामे करण्यास सुरुवात केली.
यशाची नवी वाट: 'खरात बंधू'
परंतु, नोकरीतून पाहिजे तसे पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळे घर तसेच स्वतःचे स्वप्न पूर्ण होत नाही, हे लक्षात येताच त्यांनी भाऊ आणि आईच्या मदतीने पुन्हा खिमा पाव सेंटरचा व्यवसाय सुरू केला. आईच्या हातची चव आणि भावाची साथ आज या तरुणाची ओळख बनली आहे. आज हा तरुण 'खरात बंधू' या नावाखाली खिमा पाव विकून महिन्याला ६० ते ७० हजार रुपयांची कमाई करत आहे.
श्रीकांत खरात यांचे स्वप्न आहे की, नाशिकमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात 'खरात बंधू' या नावाने त्यांची ओळख बनावी. यासाठी हा तरुण आता त्यांच्या खिमा पावच्या शाखा (फ्रँचायझी) देखील देत आहे, जेणेकरून इतरांनाही रोजगार उपलब्ध होईल. तुम्हालाही त्यांच्याकडील चविष्ट मटण खिमा खायचा असल्यास, त्यांचा पत्ता: कुलकर्णी गार्डन, राजीव गांधी भवन, नाशिक. येथे दररोज सकाळी १२ वाजेपासून उपलब्ध आहे.