राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बोलताना विखे पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. आमची भूमिका नेहमी शेतकऱ्यांना मदत करणारी असते, असे सांगत आपल्या वक्तव्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
मी आता भाषणच न करण्याचं ठरवलंय
दोन दिवसांपुर्वी मी अकलूजला कार्यक्रमाला गेलो होतो, तेथे मी काही बोललो. मी केलेले भाषण सगळे दाखवले नाही पण दुसरंच दाखवलं. अगदी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका माझ्यावर झाली. पण माझे पूर्ण भाषण दाखवले नाही. माझी बोलायची पंचायत झाली, आता भाषणच न करण्याचे मी ठरवले आहे. सोसायटीचे कर्ज काढून निवडणुका लढणे हे अ-उत्पादक स्वरूपाचे काम आहे. ते कोणते उत्पादक स्वरूपाचे काम आहे? शेवटी ते कुटुंब कर्जाच्या खाईत लोटले जाते , कर्ज थकते आणि त्यानंतर संकट ओढावते. त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होते. आमची भूमिका नेहमी शेतकऱ्यांना मदत करण्याचीच राहिली आहे. जर आम्हाला शेतकऱ्यांचे काही वाटत नसते तर 32 हजार कोटींच पॅकेज आपण दिले असते का?
advertisement
असे विखे पाटील म्हणाले.
माझा डीएनए शेतकऱ्यांचा
मी कधी शेतकरी विरोधी भूमिका घेतलेली नाही. माझा डीएनए शेतकऱ्यांचा आहे. मी मंत्री झाल्यानंतर कालव्यांसाठी ४०० कोटी रुपये दिले. कालवे , चारीला निधी दिला. शेतकऱ्यांसाठी मी नेहमीच काम केले आहे, असे विखे म्हणाले.
गुरूदेव पतसंस्थेचे काम प्रगती पथावर आहे. काटकसरीने कारभार केला जातोय. पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाताना प्रश्न निर्माण होतो. उद्घाटन झाले की पुढच्या वर्षी पेपरला बातमी येते पतसंस्थेत घोटाळा. बऱ्याचदा लोक म्हणतात संस्थेला तुमचे नाव द्यायचे. पण मी स्पष्ट सांगतो अजिबात माझे नाव देऊ नका. कारण पुन्हा वृत्तपत्रामध्ये बातमी यायची राधाकृष्ण विखे पाटील पतसंस्थेत घोटाळा, असे मिश्किल भाष्य विखेंनी केले.
