ऋषिकेशने आपल्या जिद्दीच्या जोरावर सेरेब्रल पाल्सी नावाच्या दुर्धर आजाराशी सामना करत कळसूबाई शिखर सर केला आहे. तब्बल एक हजार 646 मीटर उंची गाठून ऋषिकेशने देशाचा राष्ट्रध्वज फडकवला आहे. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीचे म्हसळावासियांसोबतच संपूर्ण देशही कौतुक करीत आहे. सेरेब्रल पाल्सी हा मेंदूचा एक विकार आहे. जो शरीराच्या हालचाली, स्नायूंचा टोन, पोश्चर आणि संतुलनावर परिणाम करतो. हा बालपणातील सर्वात सामान्य मोटर डिसऑर्डर आहे. हा आजार नाही तर मेंदूच्या असामान्य विकासामुळे किंवा नुकसानीमुळे होणारा कायमचा डिसऑर्डर आहे.
advertisement
म्हसळा शहरात राहणाऱ्या ऋषिकेशला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी ह्या आजाराचे निदान झाले होते. त्याने रसायनशास्त्र या विषयात त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून औषधशास्त्र विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या पॅरा ऑलिम्पिक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ऋषिकेशने तिसरा क्रमांक पटकवलाय. महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखर सर करायचे त्याचे स्वप्न होते. शिवऊर्जा प्रतिष्ठानकडून मिळालेली प्रेरणा आणि पालकांनी दिलेली भक्कम साथ याच्यामुळे त्याने महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केला. दुर्धर आजारामुळेही त्याने इतका मोठा शिखर सर केल्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. ऋषिकेश हा पहिला गिर्यारोहक आहे, जो दिव्यांग प्रकारात येतो. ऋषिकेशला गिर्यारोहणासाठी ज्ञानेश्वर खाडे नावाच्या शिक्षकाने मार्गदर्शन केले. अवघड पायवाटा, धडकी भरणाऱ्या दऱ्या, पायाला घाम फोडणाऱ्या लोखंडी शिड्या आणि सोसाट्याचा वारा या सर्वांवर मात करून ऋषिकेशने कळसूबाई शिखर गाठले.
