मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुरुवारी ठाणे कोर्टात हजेरी लावली. कारण होतं, 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना झालेल्या मारहाणीचं. रेल्वे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर 19 ऑक्टोबर 2008 रोजी हल्ला झाला होता. तब्बल 17 वर्षानंतर याप्रकरणात आरोपपत्र दाखल झालं आणि राज ठाकरे ठाणे जिल्हा न्यायालयासमोर हजर आले. सुनावणी सुरू होताच, अवघ्या काही मिनिटांतच संपली. न्यायमूर्ती, राज ठाकरे आणि वकील यांच्यात काही वेळ बोलणं झालं.
advertisement
कोर्टात नेमकं काय झालं?
-सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णींनी विचारणा केली- कल्याण रेल्वे प्रकरणी सर्व आरोपी हजर झालेत का?
-यावर राज ठाकरेंच्या वकिलांनी हो असं उत्तर दिलं
-त्यानंतर राज ठाकरे कोर्टरुम मधील खुर्चीवरुन उठून पुढे आले
-न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णींनी- स्वरराज ठाकरे असा नामोल्लेख केला
-ज्यावर राज ठाकरेंनी न्यायमूर्तींकडे पाहून मान हलवत होकार दिला
-प्रकरण आमच्या न्यायालयात वर्ग झालंय. तुम्हाला तुमच्यावर केलेले आरोप मान्य आहेत का? असा सवाल न्यायमूर्तींनी राज ठाकरेंना विचारला
-ज्यावर नाही असं उत्तर देत, राज ठाकरेंनी आरोप फेटाळून लावला.
-न्यायमूर्तींनी ठीक आहे असे म्हणाले.
-प्रकरणाचा खटला लवकरच सुरू करतो आणि एक महिन्यात प्रकरणाचा खटला संपवूयात असं म्हणत न्यायमूर्तींनी राज ठाकरेंना सहकार्य करण्याचं आवाहन केलं
-यावर राज ठाकरे यांच्या वकिलांनी चालेल न्यायमूर्ती म्हणत होकार नोंदवला
-शेवटी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी हे 16 डिसेंबर या दिवशी पहिल्या सत्रात सुनावणी घेऊन खटल्याला सुरुवात करूयात असं म्हणाले आणि सुनावणी संपली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे न्यायालयात हजेरी लावल्यानंतर शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी राज यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केलं.
खरंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या राजकीय युतीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण, ज्या रितीने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटीगाठी होतायेत. त्यातून घोषणा नसली तरी युती झाल्याचं स्पष्ट होतंय. राजन विचारेंनीही त्याचेच संकेत दिले.
एकंदरीतच, 2008 मधील रेल्वे भरतीवेळच्या गोंधळप्रकरण तब्बल 17 वर्षांनी सुनावणीपर्यंत पोहोचलं. पण, ज्या वेळेला या प्रकरणाची सुनावणी होतेय, त्याचा मनसेला फायदाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जसजसं हे प्रकरण पुढे जातं? त्यातून काय समोर येतं आणि राज ठाकरे आणि मनसेवर याचा काय परिणाम होतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
