मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. या युतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली जात आहे. मनसे मुंबईत ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे. राज ठाकरे यांनी आज सगळ्या मनसे उमेदवारांची शिवतीर्थ येथे बैठक घेतली.
मलाही ऑफर आलेली...
राज ठाकरे यांनी पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, असा स्पष्ट इशारा देताना आपणालाही अनेकदा प्रलोभनं देण्यात आली होती, मात्र ती ठामपणे नाकारल्याचं सांगितलं. “तुम्हाला पैशांचे आमिष दाखवले जातील. मला सुद्धा ऑफर देण्यात आल्या होत्या, पण मी त्या बाजूला सारल्या. तुम्हीही त्याला बळी पडू नका. पैसे दिले तरीही मत विकू नका. मुंबई वाचवायची आहे,” असे ठाम शब्दांत राज ठाकरे यांनी उमेदवारांना सांगितले.
advertisement
बुथवर १० माणसं ठेवा अन्...
राज ठाकरे यांनी म्हटले की, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि आपल्याकडे ही शेवटची संधी असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक व्यवस्थापनावर विशेष भर दिला. “प्रत्येक बूथवर आपली किमान दहा माणसं उभी करा. बोगस मतदान होता कामा नये. तुम्ही सतर्क राहा,” असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.
बोगस मतदानाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. “जर बोगस मतदार सापडला, तर त्याला तिथेच फटकावून काढा,” असे कडक शब्द त्यांनी वापरले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्या या सल्ल्यामुळे मनसेकडून निवडणुकीत आक्रमक आणि शिस्तबद्ध रणनीती आखली जात असल्याचं स्पष्ट होत असून, मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.
