उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे हे उद्धव यांची साथ सोडणार का, यावरही तर्क लढवले जात होते. मात्र, आज मनसेच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. ही भेट कोणत्याही राजकीय युतीसाठी किंवा गणितांसाठी नसून पूर्णपणे जनहिताच्या प्रश्नांवर आधारित होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी, शिंदे-राज भेटीवर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरे गटाला डिवचत मनसे आता शिंदे गटासोबत येणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, मनसेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर या चर्चेला पूर्ण विराम लागल्याचे दिसून येत आहे.
advertisement
> मुंबईच्या प्रश्नांवर खलबते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी मुंबईतील ज्वलंत समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. विशेषतः मुंबईतील पार्किंगचा गंभीर प्रश्न आणि रस्त्यांची दुरवस्था यावर राज ठाकरेंनी सविस्तर चर्चा केली. मुंबईकरांना दैनंदिन प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
> थेट 'नगरविकास' विभागाशी संपर्क
नगरविकास विभाग (UD Department) स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शहराच्या पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व निर्णय याच विभागांतर्गत घेतले जातात. त्यामुळे या समस्यांबाबत माहिती थेट मंत्र्यांच्या कानावर पडावी आणि त्यावर तातडीने अंमलबजावणी व्हावी, याच उद्देशाने राज ठाकरे यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
या भेटीमुळे राजकारणात चर्चा होत असली, तरी मनसेने मात्र ही भेट केवळ नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असल्याचे स्पष्ट करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
