टिप्परच्या चुकीमुळे घात
खडीने भरलेल्या भरधाव टिप्परने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे कारने अचानक पेट घेतला या भीषण अपघातात आई व मुलाचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर शुक्रवारी 11च्या सुमारास घडली. केज तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले व गेल्या काही दिवसापासून आष्टी येथे स्थायिक झालेले ऋषिकेश पुरी व त्यांची आई पुष्पा पुरी हे आपल्या कारमधून बीडच्या दिशेने जात होते.
advertisement
काय घडलं?
याच वेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवाने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला. कारने पेट घेतल्याने आत असलेल्या आई व मुलाला दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही. आगीने रौद्र रूप धारण केले मदतीसाठी लोक धावण्यापूर्वीच दोन्ही प्रवाशांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मित्रांसोबत शेवटचं बोलणं काय झालं?
मी आईसोबत नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गावी जात आहे. संध्याकाळी भेटू, बर्थ डे पार्टीसाठी देखील मित्रांना प्रॉमिस करून ऋषिकेश पुरी निघाला होता. मित्रांसोबत झालेला तो शेवटचा संवाद होता. त्यानंतर ऋषिकेश अशा अवस्थेत पोहोचला की मित्रांनाही मोठा धक्का बसला. आता त्याचा बर्थडे कधीच सेलिब्रेट करता येणार नव्हता. त्याच्या मृत्यूच्या बातमीनं मित्रांना मोठा धक्का बसला. 28 मार्च रोजी ऋषिकेशचा बर्थ डे होता.
26 वर्षीय ऋषिकेशला मोठा भाऊ आहे जो CA आहे. तो देखील पुण्यात CA कडे इंटर्नशिप करत होता. एका कार्यक्रमानिमित्ताने आईसोबत नातेवाईकांकडे जात असताना ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शिंच्या म्हणण्यानुसार आगीचा भडका खूप मोठा होता. स्थानिकांनी पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण आग अटोक्यात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. शिवाय कारला आग लागल्यानंतर दरवाजे लॉक झाल्यामुळे आई आणि मुलाला वाचवता आलं नाही.
