सांगली - सांगलीच्या वाळवा तालुक्यातील आष्टा हे ब्रिटिश काळापासूनच मोठे महसुली क्षेत्र असलेले गाव आहे. या गावामध्ये ऊस, केळी, भाजीपाला अशा वेगवेगळ्या पिकांची उत्तम शेती करणारे अनेक शेतकरी आहेत. यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनील माने हे आहेत. सुनीन माने हे अत्यंत प्रगतशील शेतकरी मानले जातात. नुकतेच त्यांनी पपई पिकातून 53 टनाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. नेमके त्यांनी हे उत्पादन कसे मिळवले, त्याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
2014 पासूनऊस शेतीला संपूर्ण फाटा देऊन फळ आणि भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांनी 3 एकर पपई लागवडीतून 14 लाखांचे उत्पादन घेत शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी एकच पीक घेण्याऐवजी बहुपीक पद्धतीने पिके घेतली पाहिजेत, असे त्यांना वाटते.
सुनील माने यांचे एकत्र कुटुंब आहे. त्यांनी 3 एकर शेतीची नांगरणी केली. एकरी सुमारे 10 ट्रॉली शेणखत पसरले. पपईची 3 एकरवर लागवड केली. परांडा धाराशिव येथून 2 हजार 700 रोपे आणली. 5 बाय 9 फुटावर रोप लावले. त्यास ठिबकने पाणी दिले. या झाडांना पाण्यात विरघळणारी विद्राव्य खते दिली. तसेच वेळोवेळी बुरशीनाशके, कीटकनाशके फवारली. या पपईला 7 फेब्रुवारी 2024 पासून फळे येण्यास सुरुवात झाली आहे.
सायकलवर विकले पापड, शेवया; पती-पत्नीच्या मेहनतीला फळ, वर्षाला 30 लाखांची उलाढाल
8 ते 10 दिवसांनी पपई तोडून ती मुंबई, कोलकाता यासह तसेच आष्टा व परिसरात विक्री केली जाते. तर उर्वरित फळे ते इस्लामपूर, शिराळा, घोगाव, पलूस येथील कारखान्यांना चेरी तयार करण्यासाठी पाठवतात. सप्टेंबरअखेर त्यांना 3 एकरात सरासरी 52 ते 53 टन पपईचे उत्पादन मिळाले. यातून त्यांना 14 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
लोकल18 शी बोलताना कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनील माने यांनी सांगितले की, "शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे. देशी गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या पालन करीत स्लरी तयार केली आहे. देशी केळी 60 गुंठे, व्हीएनआर पेरू 60 गुंठे, 5 एकरात नवीन 15 नंबर पपई तर 4 एकरमध्ये झेंडू लागवड केली आहे. तसेच जी नाईन 6 एकर केळीची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे आहे," असे ते यावेळी सांगितले.
मागील काही दिवसात वेळोवेळी अतिपाऊस, ऊन यामुळे पपईची बाग लवकर संपल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. पण, पपईचे पिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, असेही सुनील माने यांनी यावेळी बोलताना सांगितले.