ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आघाडीचे सरकार करणार असून आघाडीच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आलोय...
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक होत आहे. मी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आलोय. निलेश लंके यांला तुम्ही निवडून दिलं. त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण आपल्यााठी लोकसभेची निवडणूक खूपच महत्वाची होती. देशाचे पंतप्रधान चारशे पारचा नारा देत होते. बहुमतासाठी २७५ जागांची गरज असताना चार सौ पारचा हट्ट कशासाठी? तर यांना बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान बदलायचं होतं. मात्र आम्ही विरोधी पक्षांनी एकत्र येवून त्यांचा डाव हाणून पाडला, असे पवार म्हणाले.
advertisement
प्रत्येक ठिकाणी लोक म्हणताहेत हे आम्हाला पटले नाही
अडीच वर्ष राज्यात भाजप आणि आमच्यातून फुटून गेलेल्यांचे राज्य होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकार पाडले. एकनाथ शिंदे प्रत्येक सरकारमध्ये मंत्री होते. तरीही पक्ष फोडण्याचे काम त्यांनी केले. तुम्ही ठरवा हे योग्य आहे का? मी दररोज चार पाच सभा घेतोय.प्रत्येक ठिकाणी लोक म्हणताहेत हे आम्हाला पटले नाही. पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला नाही, अशा शब्दात पवार यांनी शिंदे-फडणवीस आणि अजितदादांना सुनावले.
लोकसभेच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षाला चिंता वाटायला लागली
लोकसभेच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षाला चिंता वाटायला लागली. म्हणून त्यांनी लाडक्या बहिण सारखी योजना आणली. मात्र महिलांवर अत्याचार होताहेत, शेकडो बहिणींचे अपहरण झाले आहे. त्यांचा पत्ता लागत नाही आणि सत्ताधारी पक्षाचे लोक लाडक्या बहिणीचा गरज करतात? महिलांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल पवार यांनी विचारला.
देशात आजघडीला शेतकऱ्यांविषयी आस्था असणारे सरकार नाही
मी देशाचा कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर तातडीने देशात कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. परंतु देशात आजघडीला शेतकऱ्यांविषयी आस्था असणारे सरकार नाही, अशी टीका पवार यांनी केली.
