शरद पवार आणि पार्थ, जय पवार यांच्यासोबत विद्या प्रतिष्ठान संकुलात बैठक घेतली. विद्या प्रतिष्ठानमध्ये विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत इतर विश्वस्तही बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसासोबतच त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर, आता अजितदादांकडे असलेल्या महत्त्वाच्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांमधील पदांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात येणार आहे.
advertisement
विद्या प्रतिष्ठानमध्ये पवारांची महत्त्वाची बैठक
बुधवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते. अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लावायची, याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
अजितदादांची 'ही' पदे आता चर्चेत
अजित पवार हे केवळ राजकारणातच नव्हे, तर सहकार आणि शिक्षण क्षेत्रातही अत्यंत प्रभावशाली होते. त्यांच्याकडे असलेल्या खालील पदांवर आता कोणाची नियुक्ती होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपद अजित पवारांकडे होते. त्याशिवाय, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त होते. त्याशिवाय, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदी देखील अजित पवार होते. अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य पदी होते.
सुनेत्रा पवार, पार्थ की जय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात. तर, तरुण नेतृत्वाकडे संधी देण्याच्या विचारातून जय आणि पार्थ पवार यांच्याकडे काही संस्थांची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.
भविष्यातील राजकारणावरही खल...
विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि विजया पाटील यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली. या बैठकीत केवळ संस्थात्मक पदेच नव्हे, तर भविष्यातील राजकीय समीकरणांवरही खल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय अर्थ काय?
अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबात कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ नयेत आणि सर्व संस्थांचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी शरद पवार स्वतः पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. या पदवाटणीतून पार्थ आणि जय पवार यांना सक्रिय प्रशासकीय कामाचा अनुभव देण्याचा प्रयत्नही यामागे असू शकतो.
