खोपोली : राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे, अशातच रायगडमधील खोपीलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे यांच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. भर रस्त्यावर हल्लेखोरांनी तलवार, कोयत्याने 24 ते 27 वार करून हत्या केली. अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगेश हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. मंगेश काळोखे यांच्यावर हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि धारधार शस्त्रांनी पाठलाग करून हत्या केली होती. या घटनेचा आता सीसीटीव्ही समोर आला आहे.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हल्लेखोर मंगेश काळोखे यांचा पाठलाग करत आहे. रस्त्यावर पुढे जाऊन मंगेश काळोखे हे खाली पडले. त्यानंतर ३ जणांनी त्यांना घेरलं आणि एकापाठोपाठ सपासप तलवार आणि कोयत्नाने वार केले. काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हल्लेखोरांनी सपासप वार केल्याचं दिसतं आहे. जवळपास २४ ते २७ वार हल्लेखोरांनी केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखे हे जागेवर कोसळले. काळोखे यांचा मृत्यू झाल्याचं समजून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
कुणी केला हल्ला?
मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊंसर आणि इतर तीन अनोळखी लोकांविरोधात खोपोली पोलिसात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येचा कट कुणी रचला?
सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी खुनाचा कट रचला असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या आरोपींनी तलवार, कोयत्या आणि कुऱ्हाडीने वार करून मंगेश काळोखे यांची हत्या केली. अलीकडेच झालेल्या खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पराभव आणि राजकीय वादातून हे हत्याकांड घडलं असल्याचं पोलिसांकडे फिर्यादींनी सांगितलं.
खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीमध्ये जाऊन मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केलं. "मंगेश काळोखे यांची हत्या सुडा पोटी करण्यात आली असून अशा प्रवृत्तीच्या लोकांना फासावर लटकवण्यात यावं अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. पोलीस देखील या प्रकरणाचा तपास अधिक तीव्रतेने करत असून लवकरात लवकर ही प्रकरण मार्गी लागेल, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे. शिवाय या हत्येमागे जे कोणी असतील ते कदापी सुटणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
