महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचा मुलगा डॉ. किरण देशमुख यांच्यावर गभीर आरोप केले होते. प्रभाग 2 मधील भाजपचा पॅनल बिनविरोध करण्यासाठी विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या मुलाने मोठा दबाव निर्माण केला होता, त्यांच्यामुळेच मनसे नेता बाळासाहेब सरवदे याचा खून झाला. मनसे नेते प्रशांत इंगळे खून झाल्यापासून भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि डॉ. किरण देशमुख यांच्यावर आरोप करत होते.
advertisement
भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख, कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि शालन शिंदे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शालन शिंदे या हत्येच्या आरोपाखाली सध्या कायदेशीर कारवाईला सामोरे जात असतानाही मतदारांनी त्यांना कौल दिला आहे. भाजपच्या या विजयामुळे स्थानिक राजकारणात पक्षाची पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे.
हा प्रभाग चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे निवडणुकीपूर्वी झालेली मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून भाजपच्या दोन गटात झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि राजकीय वादाचे पर्यावसान हिंसेत झाल्याने टीकेची झोड उठली होती. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालाने भाजपसाठी दिलासादायक चित्र निर्माण केले असून विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 102 पैकी 49 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर शिवसेनेला 21, काँग्रेसला 11, एमआयएमला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 4, बसपाला 4 आणि माकपला 1 जागा मिळाली होती. आता 2026 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
