शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे या नांदेडच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार अपघात प्रकरणाच्या चौकशीवर प्रतिक्रिया देताना राज्याच्या राजकारणात भूकंप घडण्याचे संकेत दिले.
"काही जण हे शिवसेनेच्या संपर्कात आहे, अशी चर्चा आहे" असं पत्रकारांनी विचारलं असता, यावर ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "कुछ तो बडा होनेवाला है, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार आहे. मग ते नक्की, ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन तुतारी होईल, हे मी योग्य वेळ आल्यावर सांगेल. कारण, राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं. ती वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की सांगू, काय काय होणार आहे आणि कोण सोबत येणार आहे" अशी प्रतिक्रिया ज्योती वाघमारेंनी दिली.
advertisement
'अजितदादा विमान अपघात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल'
तसंच, "सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या बहीण आहे. एका बहिणीची माया भावाबद्दल काय असते ती शब्दात वर्णन करू शकत नाही. त्यामुळे जर अजितदादांबाबत काही वेदना वाटत असेल तर एक बहिण म्हणून मी वेदना समजू शकते. सुप्रिया सुळेच नाहीतर महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण जी अजितदादांना भाऊ मानते, तिला अजितदादांच्या अपघाताबद्दल प्रचंड वेदना होत असेल. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला, याची चर्चा रंगली आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहे, विधानसभेत अशी माहितीही दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस नक्की आपला शब्द पाळतील, त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल' असंही ज्योती वाघमारेंनी सांगितलं.
