राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्याकरता आलेल्या होत्या. या दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी एक एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता त्या दिल्लीत दाखल झालेल्या होत्या. आज सकाळी जवळपास ११ वाजताच्या दरम्यान त्या संसदेच्या राज्यसभा सभागृहात दाखल झाल्या. सोबतच संसदेच्या सभागृहात त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याशिवाय राज्यसभेतील अनेक सहकाऱ्यांसोबत संवाद साधला. मात्र यावेळी त्यांच्यासोबत तटकरे आणि पटेल उपस्थित नव्हते. यावरच सुनेत्रा पवार यांनी सूचक उत्तर दिले.
advertisement
प्रफुल पटेलांवर प्रश्न, सुनेत्रा पवारांचे सूचक वक्तव्य
एरवी दिल्ली वारीत पटेल-तटकरे सोबत असतात, मात्र यावेळी दोघेही सोबत का नाहीत? असे कारमध्ये बसताना सुनेत्रा पवार यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “तुम्हालाच माहिती असेल… ते कधी येतात आणि कधी जातात, मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही,” असे म्हणत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र या एका वाक्यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. तसेच तटकरे पटेल आणि पक्षनेतृत्वात अंतर पडले आहे का? हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सुनेत्रा पवार आणि तटकरे-पटेलांमध्ये कशावरून वाद सुरू झाला?
प्रफुल्ल पटेल यांनी १६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला एक पत्र दिल्याचे सांगितले जाते. या पत्राची प्रत अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र या पत्रातून पक्षातील सगळे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे राहतील, असे प्रफुल पटेल यांनी लिहिल्याचे आरोप होत आहेत. याची कुणकुण सुनेत्रा पवार यांना लागल्यानंतर त्यांनी १० मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. यापूर्वी आयोगाकडे केलेला सगळा पत्रव्यवहार रद्दबातल समजावा, असे नमूद करून पटेल यांचा डाव उधळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सुनेत्रा पवारांच्या पत्रात तटकरे-पटेल पदांविना!
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये फक्त स्वतःच्या पदापुढे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला केला. तसेच खजिनदार म्हणून विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी शिवाजीराव गर्जे यांचा उल्लेख केला आहे. पत्रात तटकरे-पटेल यांच्या नावांसमोर कोणत्याही पदांचा उल्लेख केला नाही. त्यामुळे त्यांची पदे काढण्यात आली किंवा कसे? यावरून जोरदार चर्चा सुरू झाली.
