राष्ट्रवादी पक्षातलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पद असलेलं पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात केवळ सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे पद आहे. बाकीच्या नेत्यांच्या नावांपुढे नाही. याचा खुलासा जरी पार्थ पवार यांनी केला असला तरी या पत्राची तारीख महत्त्वाची आहे जी २६ फेब्रुवारी २०२६ . निवडणूक आयोगाला एक पत्र राष्ट्रवादीने १० मार्च २०२६ रोजी लिहिलं होतं. एक पत्र १६ फेब्रुवारीला लिहिले होतं या सगळ्या पत्रांमुळे घोळात घोळ झालाय. कोणते पत्र काय आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो याबाबत हा घोळ आहे.
advertisement
पत्र क्रमांक १ - १६ फेब्रुवारी २०२६
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर १६ फेब्रुवारी रोजी या दिवशी प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे , ब्रीज मोहन श्रीवास्तव यांच्या सहीचे एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं. ज्यात पक्षाच्या संविधानात करण्यात आलेले बदलांबाबत निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं. ३० नोव्हेंबर २०२३ कर्जत इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हे बदल करण्यात आले असं म्हटलं आहे. हे पत्र कार्यकारिणी झाल्यानंतर तब्बल २ वर्ष ३ महिन्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूनंतर देण्यात आलं. याच पत्रात पक्षाच्या अध्यक्षाच्या अनुपस्थितीत सर्व अधिकार हे कार्यकारी अध्यक्षांना असतील. सगळ्या नियुक्त्या करण्याचे अधिकार कार्यकारी अध्यक्षाला असतील, असं म्हटलं होतं. या पत्रावर केवळ तीन नेत्यांच्या सह्या होत्या. यातून प्रफुल्ल पटेल पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे पत्र दिले आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता.
पत्र क्रमांक २- २६ फेब्रुवारी 2026
या दिवशी पक्षातील पदाधिकारी यांची राष्ट्रीय कार्यकारिणी होऊन या सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत नावे समाविष्ट करण्यात आल्याचं म्हटलं ते पत्र कालपासून व्हायरल होत आहे. याच पत्रात फक्त सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख आहे तर शिवाजीराव गर्जे यांचा कोषाध्यक्ष म्हणून पदांचा उल्लेख करण्यात आलाय. त्यातून जाणिवपूर्वक प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या नावापुढे पद लिहिले गेले नाही. कारण, सुनेत्रा पवार या दोन्ही नेत्यांवर नाराज आहेत, अश्या चर्चा सुरू होत्या. पण या पत्रातील दोन्ही पदांची नावं ही नंतर पेनाने लिहिण्यात आली. ती ही दोन वेगवेगळ्या व्यक्तींची वेगळ्या हस्ताक्षरातील आणि वेगळ्या शाई वापरून लिहिलेली आहेत. याचा अर्थ ती एका व्यक्तीने लिहिलेली नाहीत.
पत्र क्रमांक ३- १० मार्च २०२६
हे पत्र आहे १० मार्चचं आहे, ज्या पत्रात २८ जानेवारी ते हे पत्र मिळेपर्यंत निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून जो काही पत्र व्यवहार करण्यात आला तो निरस्त समजावा, असं म्हटलं आहे. हे पत्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा या नात्याने सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहेत. त्यामुळे आता जर का सुनेत्रा पवार यांनी म्हटल्या प्रमाणे मधल्या काळात दिलेली पत्र ही ग्राह्य धरायची नाहीत. तर त्या काळात घेण्यात आलेली राष्ट्रीय कार्यकारी ग्राह्य धरायची का? या कार्यकारिणीने केलेले ठराव ग्राह्य धरायचे का? ज्या प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा ठराव करण्यात आला. इतकेच काय तर मग सुनेत्रा पवार यांची ही निवड ग्राह्य धरायची नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या सहीने पार्थ पवार यांनी खासदारकीचा अर्ज भरलाय तो अर्ज भरून निवडणूक जिंकली मग ही ग्राह्य धरायची नाही का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
निवडणूक आयोगाकडे सगळ्यात शेवटी १० मार्चचं पत्र देण्यात आलं होतं, त्यानंतर कुठले पत्र गेले असेल तर त्याची माहिती नाही. परंतू, जी उपलब्ध पत्र आहेत ती अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहेत.
या पत्रात नेमकं आहे काय?
पहिलं पत्र
16 फेब्रुवारी 2026
पक्षाध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्वाधिकार कार्याध्यक्षांकडे
दुसरं पत्र
26 फेब्रुवारी 2026
सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख
तटकरे-पटेलांच्या पदाचा उल्लेख नाही
तिसरं पत्र
10 मार्च 2026
निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांचं पत्र
मधल्या काळातील पत्र ग्राह्य धरू नये
