पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठी चुरस निर्माण झाली आहे. १८ मार्च रोजी होणाऱ्या या निवडीवेळी पक्षात कोणतीही गटबाजी किंवा नाराजी उरू नये, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून थेट अर्ज मागवण्यात आले आहेत.
advertisement
सुनेत्रा पवारांकडे 'रिमोट कंट्रोल'
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबतचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेणार आहेत. या प्रक्रियेमुळे निवडीत पारदर्शकता येईल आणि नाराजी नाट्य टाळता येईल, असा विश्वास पक्षनेतृत्वाला वाटत आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वीरधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील, अंकिता पाटील ठाकरे, शांताराम इंगोले आदींनी आपला दावा मजबूत केला आहे. या दिग्गज उमेदवारांमुळे निवडीचा पेच अधिकच वाढला आहे. कौटुंबिक आणि राजकीय वारसा असलेल्या या नावांपैकी सुनेत्रा पवार कोणाला संधी देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाची नोंदणी
दरम्यान, राजकीय तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. १८ मार्चच्या निवडणुकीसाठी पक्षाने आपली रणनीती आखली असून, सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान आता सुनेत्रा पवारांसमोर असणार आहे.
