पंढपूर: यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहे. हातातोंडाशी आलेलं पिक पाण्यात पाहून गेलं आहे. राज्य सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे. पण, अशातच भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर वेगळाच सूर लगावला आहे. 'कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची' असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.
advertisement
राधाकृष्ण विखे पाटील आज शुक्रवारी पंढपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर भाष्य केलं.
'सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे,कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची' असं वादग्रस्त विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. पण, आपल्याकडून कर्जमाफीच्या मुद्यावर चुकीचं वक्तव्य केलंय, हे लक्षात येताच त्यांनी चूक सुधारली.
काय म्हणाले विखे पाटील?
"सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. अनेक वर्ष काम चालू आहे, याच चिंता करायचं काम नाही. महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. ते करणारच आहोत. परंतु, तिथंपर्यंत आपलं काम थांबता कामा नये. उद्याच्या तरुणाच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, उद्योग उभारावे लागणार आहे, असं म्हणत विखेंनी सारवासारव केली.
उद्धव ठाकरेंवर टीका
तसंच, 'कोविडच्या काळामध्ये दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवाल करत माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणतं लोकांना वाऱ्यावर सोडत घरात बसले होते आणि आता मराठवाड्यात फिरत आहेत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
