तळोदा तालुक्यातील नयामाळ येथील जानू सिमजी वसावे यांच्या पत्नीची घरीच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर आई आणि बाळाला मोदलपाडा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्याची गरज होती. परंतु, गावात रस्ता नसल्याने त्यांना बांबूच्या झोळीतून प्रवास करावा लागला.
पती जानू वसावे आणि आशा वर्कर अनिता वसावे यांनी बाळाला आणि मातेला खांद्यावर घेऊन चिखलातून प्रवास सुरू केला. रिमझिम पावसात, चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून त्यांना नयामाळ ते इच्छागव्हाण हे 10 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 7 तास लागले.
advertisement
उपचार मिळण्याआधीच बाळाचा मृत्यू
इच्छागव्हाण येथे पोहोचल्यानंतर त्यांना सरकारी वाहन मिळाले आणि त्यातून मोदलपाडा आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, बाळाचा आधीच मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे पालकांनी मोठा आक्रोश केला.
ग्रामस्थांची नाराजी
नयामाळ ते इच्छागव्हाण या गावांना जोडणारा रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना आजही अशा परिस्थितीत पायपीट करावी लागते. अनेक वर्षांपासून रस्ता मिळावा अशी मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : Tea Side Effects : चहाचं आहे व्यसन, पण जिभेवर जाणवतोय 'हा' बदल? डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण
हे ही वाचा : Priya Marathe : 'आदल्याच दिवशी मेसेज केलेला...', अभिजीत खांडकेकर भावुक, सांगितली प्रियाची शेवटची आठवण