मुंबई: मराठवाड्यात आलेल्या पूराबाबत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ न घालवता तातडीने आर्थिक मदत बँक खात्यात जमा करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारने पहिल्यांदा नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा असेही ठाकरे यांनी म्हटले. जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड,, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली असल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत असल्याचे टीकास्त्र ठाकरे यांनी सोडले आहे.
एकही मंत्री बांधावर फिरकलेला नसून मराठवाड्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू असल्याची बोचरी टीका ठाकरे यांनी केली.
जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? असा सवाल त्यांनी केला. केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.