लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.
उद्धव ठाकरेंनीही त्यांचा पक्ष आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतूनच लढवणार असल्याचं आधीच स्पष्ट केलंय. परिणामी आगामी निवडणुकीच्या संदर्भातील रणनितीच्या दृष्टीकोनातून उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तर शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून जिव्हारी लागणारी टीका केली आहे. 'सोनिया गांधी यांचं किंवा राहुल गांधी यांचं काही काम असेल म्हणून ते आज्ञेच पालन करण्यासाठी येत असतील', असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.
advertisement
नरेश म्हस्केंनी दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केल्यामुळे ठाकरे गटाचे नेते पेटून उठले नसते तरच नवल. गुजरातच्या आज्ञेचं पालन करण्याची सवय झाल्याचा परिणाम नरेश म्हस्केंवर झाल्याचा जोरदार पलटवार ठाकरे गटाचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मागील दोन वर्षांपासून सातत्यानं संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडत असतात. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी त्यांना कोणताही मुद्दा पुरेसा ठरतो. आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा खणाखणी सुरू झाली आहे.
