एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीत चांगलीच लढत झाली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी आपली जादू दाखवत 57 जागा निवडून आणल्या. तर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 20 जागांवर समाधान मानावे लागले. उद्धव यांचे बहुतांशी आमदार मुंबईतून निवडून आले. तर, शिंदे यांचे आमदार मुंबई महानगर क्षेत्र, मराठवाडा आणि इतर भागातून निवडून आले.
advertisement
उद्धव यांना धक्का बसणार ?
टाईम्स ऑफ इंडियाने राजकीय निरीक्षकांच्या हवाल्याने म्हटले की, उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक धक्का बसू शकतो. शिवसेनेतील फुटीनंतर मोठ्या प्रमाणावर आमदार-खासदार फुटून शिंदेंसोबत गेले. मात्र, सामान्य शिवसैनिक हा उद्धव यांच्यासोबत राहिला. लोकसभेतील कामगिरीने पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. विधानसभेत मात्र पक्षाला मोठा धक्का बसला. आता उद्धव यांच्यासोबत निवडून आलेल्या 20 आमदारांपैकी काही जण त्यांची साथ सोडण्याची शक्यता आहे.
उद्धव यांची साथ का सोडणार?
टाईम्स ऑफ इंडियाने राजकीय निरीक्षकांच्या हवाल्याने सांगितले की, ठाकरे गटाचे काही आमदार आणि आतापर्यंत सोबत राहिलेले पदाधिकारी हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. निवडणुकीच्या मैदानात एकनाथ शिंदे यांना घवघवीत यश मिळाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वातील शिवसेना ही खरी शिवसेना असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांच्यासोबत फक्त आमदार, खासदार गेले नाही तर शिवसेनेचा पारंपरीक मतदारही सोबत राहिला असल्याचे चित्र आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा कमबॅक करणे अवघड आहे. ठाकरेंसोबत राहिल्याने या आमदारांना आपली कोंडी होण्याचीदेखील भीती आहे. तर, स्थानिक पातळीवरही समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सोडू जाऊ शकतात. शिवसेनेत 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी फूट पाडल्यानंतर ठाकरेंबाबत सहानुभूती होती. ती सहानुभूतीची लाट ओसरली असल्याचे समोर आले आहे.
