मिळालेल्या माहितीनुसार, नांद्रे-सांगली राज्यमार्ग क्रमांक १४२ वर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वडाप जीप नांद्रे येथून सांगलीकडे निघाली होती. नावरसवाडी नवीन पुलाच्या पुढील वळणावर आल्यानंतर चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक निघाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे जीप रस्त्यावर पलटी झाली.
वडाप जीपमध्ये प्रवाशांची संख्या जास्त होती, त्यामुळे काही कळायच्या आत जीप रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन पडली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले. यामध्ये ९ जण गंभीर तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
advertisement
घटनेची माहिती मिळताच नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. असिमा मित्रा यांनी तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केली. रुग्णवाहिका चालक तोहिद मुल्ला यांनी जखमींना त्वरित बाहेर काढून उपचारासाठी सांगली येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
