राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा मिळावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधत सरकारची कोंडी केली आहे. तर दुसरीकजे आज बंजारा समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाला बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे.
advertisement
धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात
वंजारा - बंजारा एक आहे या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक झाला आहे. वंजारा बंजारा एक नाही, या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा -बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, अशी मागणी करत बंजारा समाजाने घोषणाबाजी केली. यामुळे बंजारा आणि वंजारा एक यावरून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
बंजारा समाज आक्रमक
बंजारा समाज बांधव म्हणाले, बंजारा समाजाच्या मोर्च्याला पाठींबा देण्यासाठी धनंजय मुंडे आले होते. ते म्हणाले वंजारा - बंजारा एकच आहे. 1994 मध्ये वंजारा - बंजारा एकच आहे असे वक्तव्य करत गोपीनाथ मुंडेंनी आमचे अडीच टक्के आरक्षण खाल्लं आहे. आमचं एवढच म्हणणे आहे की, वंजारा - बंजारा एक नाही. दोन्ही वेगळ्या संस्कृती आहे, दोन्ही वेगळ्या भाषा आहेत. परत तो खेळ आमच्यासोबत करायचा नाही. तुमचं वक्तव्य मागे घ्या, अशी संपूर्ण समाजााची मागणी आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावे यासाठी हा मोर्चा आहे. आज तुम्ही मोठ्या संख्येने जमलात याचा आनंद होत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे मी आभार मानतो. आता बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी भलेही अभ्यास गट नेमा, समिती नेमा पण आरक्षण द्या... मी नशीबवान आहे, आज मंत्री असतो तर या मोर्चाला येता आला नसतो. सरकारला विनंती करतो हैदराबाद गॅझेटमध्ये अनेक समाज एसटीमध्ये आहेत. त्यांना लाभ कसा देता येईल हे सरकारने पाहावे. तेलंगणामध्ये आमच्या सुद्धा नोंदणी एसटीमध्ये निघतात, त्यामुळे बंजारा आणि वंजारा एकच आहे.