चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील आकापूर गावात शिवानी वडेट्टीवार यांनी वडिलांच्या प्रचारानिमित्त कोपरा सभा घेतली. यावेळी त्यांनी अतिशय आक्रमक अंदाजात भाषण केले. मात्र वीज गेल्याने त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संतापून त्यांना शिवीगाळ केली.
आजचा विरोधी पक्षनेते, उद्याचा मुख्यमंत्री
आजचा विरोधई पक्षनेते हा उद्याच्या मुख्यमंत्री असतो. म्हणून विजुभाऊंना मोठ्या बहुमतांनी निवडून द्या, असे वक्तव्य शिवानी वडेट्टीवार यांनी केले. विजुभाऊ निवडून आले तर मोठ्या पदावर जाणार आहेत, हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा, असेही उपस्थितांना सांगायला त्या विसरल्या नाहीत. समोरील उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पहिल्यांदा आमदार झाल्यावर विधिमंडळात काम कसं चालतं, निधी कसा आणतात, निधी कुठून आणतात, कसा आणतात हे समजायला त्याला १० वर्षे लागतील. त्यामुळे विजुभाऊंना निवडून द्या, असे आवाहन शिवानी वडेट्टीवार यांनी केले.
advertisement
भाषणादरम्यान वीज गेली, शिवानी वडेट्टीवार संतापल्या
शिवानी वडेट्टीवार यांच्या आकापूर गावातील भाषणादरम्यान वीज गेल्याने त्या चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. सर्वसामान्य लोकांचे जीवन अंधारात टाकण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. कधीही वीज घालवतात आणि ८००-१००० रुपये बील पाठवतात. त्यांना एवढं बील पाठवायला शरमही वाटत नाही. सत्तेत आले तर वीज मंडळाला धडा शिकवू, असे त्या म्हणाल्या. वीज मंडळाविषयी आणि अधिकाऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवानी वडेट्टीवार अडचणीत आल्या आहेत. स्थानिक विरोधकांनी त्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
विदर्भात कुणाची सरशी? काँग्रेस की भाजप?
विदर्भातील 62 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकून सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. कारण काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये अनेक ठिकाणी एकास एक लढत होत आहे. जो पक्ष विदर्भात जास्तीत जास्त जागा जिंकेल तो सत्तेच्या अधिक जवळ जाईल, असे समीकरण आहे त्यामुळे विदर्भाची जनता कोणत्या पक्षाला मतरूपी आशीर्वाद देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.