मृत व्यक्तीचे नाव प्रताप नाईक (55) असे असून ते अॅक्टिव्हावरून विरार तांदूळ बाजारकडून विरार फाट्याकडे जात होते. मात्र, रस्त्यातील मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी गेल्याने गाडी घसरली आणि ते रस्त्यावर कोसळले. दुर्दैवाने, त्याच क्षणी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा टँकर त्यांच्यावरून गेला. या भीषण अपघातात प्रताप नाईक यांचा जागीच मृत्यू झाला.
टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात
advertisement
अपघातानंतर टँकर चालक आनंदकुमार रामलाल यादव (28) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर काही वेळातच परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले होते. खड्ड्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मृत्यू झाल्याने नागरिकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित केले आहेत.
परिसरात मोठी खळबळ
दरवर्षी पावसाळ्यानंतर रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात, परंतु त्याकडे संबंधित विभागांकडून दुर्लक्ष केले जाते, अशी नागरिकांची नाराजी आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असून, या वेळी प्रताप नाईक यांचा बळी गेला आहे. अपघाताची बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.
तीव्र आंदोलनाचा इशारा
नवरात्रीसारख्या सणासुदीच्या काळात अशा दुर्घटना होणे ही प्रशासनाची गंभीर चूक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर विरारमध्ये शोककळा पसरली असून, प्रताप नाईक यांच्या मृत्यूने परिसरातील सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.