हिटवेवचा धोका कुठे?
अकोला, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा एकदा हिटवेवचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांमघ्ये उन्हाचा तडाखा जास्त राहणार आहे. तापमान 40 डिग्रीपर्यंत जाण्याचा धोका आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांची दिशा बदलल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे.
advertisement
नेमकी स्थिती काय?
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढच्या चार दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार आहे. येत्या १५ आणि १६ मार्च रोजी विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम म्हणून मध्य पाकिस्तानवर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. याच काळात दक्षिण कोकण आणि मुंबईच्या परिसरापासून एक हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. या दोन्हीमुळे वातावरण प्रचंड बिघडणार असून एकीकडे कमालीची उष्णता वाढेल तर दुसरीकडे गारपीट वाढणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विदर्भातील नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी लागेल. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि लातूर या भागातही ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
मुंबईकरांना दिलासा मिळणार?
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास गेल्याने हीट वेव्हची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे आता मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात उन्हाचा कडाका काहीसा कमी होऊन तापमानात घट होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे की, इराणमधील रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यामुळे तिथला धूर आणि ढग भारतात येत असून त्यामुळे ॲसिड रेन होऊ शकते. मात्र, हवामान तज्ज्ञांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत
इराण भारतापासून सुमारे ३००० किमी दूर असून, तिथल्या धुराचा किंवा ढगांचा भारताच्या हवामानावर कोणताही परिणाम होणार नाही. सध्याची धुंद ही केवळ धूळ आणि आर्द्रतेमुळे निर्माण झाली आहे. मार्च महिना हा पिकांच्या कापणीचा काळ असतो. अशातच धुळीचं वादळ आणि अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी धास्तावला आहे. कापणीला आलेला गहू, हरभरा आणि फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
