इस्लामाबादहून भारताच्या दिशेनं वारे पुढे सरकले असून सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरापासून काही अंतर जमिनीवर तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. दुसरीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारपिटीचा अंदाज आहे.
पुढच्या 24 तासांत किमान तापमानात ४ अंशाने घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात ४ डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस तापमानात अंशत: घट होईल आणि पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बाकी ठिकाणी हवामान ढगाळ राहील. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे.
advertisement
29 मार्च रोजी कोकण पट्टा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 50 किमी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री घेऊनच बाहेर पडा असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 30-31 आणि 1 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहील. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. कोण्हेरी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मका पीक पूर्णपणे आडवे झाले आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतलेले पीक मातीमोल झाल्याने आर्थिक फटका बसला असून चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातल्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्यात. मागील काही दिवसांपासून तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले होते. सकाळपासून कडक ऊन असताना संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बारामती शहरात काल सायंकाळी अचानक वातावरणात मोठा बदल झाला असून, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.बारामती आणि परिसरात अचानक आलेल्या या बदलामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहताना दिसले, तर काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.
