पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात व्यापक सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. नववर्षाच्या जल्लोषादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये रायफलधारी जवान तैनात केले जाणार आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल 67 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असून, प्रत्येक चेकपोस्टवर एक उपनिरीक्षक आणि पाच पोलिस कर्मचारी (शस्त्रधारी जवानांसह) तैनात असतील.
advertisement
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, ब्रिथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. हसूल, जालना, बीड, पैठण रोड, वाळूज नाका आणि दौलताबाद टी-पॉइंट येथे विशेष नाकाबंदी केली जाईल.नववर्षाच्या रात्री हॉटेलमध्ये होणारे वाद, गोंधळ किंवा महिलांची छेडछाड रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पाच विशेष पथके सतत गस्त घालणार आहेत. सर्व हॉटेल्स आणि ढाब्यांना ठरलेल्या वेळेच्या मर्यादेतच व्यवसाय बंद करावा लागणार आहे.
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या राजकीय हालचाली लक्षात घेता, शहरात अतिरिक्त सतर्कता ठेवण्यात आली आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे निर्माण झालेली नाराजी आणि विविध राजकीय गटांतील तणाव लक्षात घेऊन अंतर्गत भागांमध्येही फिरते पथक तैनात करण्यात आले आहेत.हा संपूर्ण बंदोबस्त पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर (परिमंडळ १) आणि प्रशांत स्वामी (परिमंडळ २) यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली राबवण्यात येणार आहे.
सहायक पोलिस आयुक्त व सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी स्वतः त्यांच्या हद्दीत गस्त घालणार आहेत.आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि अमली पदार्थविरोधी पथकाची आठ विशेष पथके रात्रभर शहरात कार्यरत राहणार आहेत.आपत्कालीन प्रतिसादासाठी विशेष दले सज्ज आहेत. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ कारवाईसाठी नियंत्रण कक्षात स्ट्रायकिंग फोर्स, क्यूआरटी, वज आणि वरुण ही विशेष वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. सायबर गुन्ह्यांवरही सायबर सेलचे बारीक लक्ष राहणार आहे.नववर्षाचा आनंद साजरा करताना नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये आणि सार्वजनिक शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
