मृत्युपत्र करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही. तसेच त्याचे नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे कायद्याने बंधनकारक नसते, जरी नोंदणी करणे सुरक्षित मानले जाते. मृत्युपत्राचा परिणाम तो करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लागू होतो.
बक्षीसपत्र म्हणजे काय?
बक्षीसपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला मोफत देण्याचा कायदेशीर दस्तऐवज. ज्याने मालमत्ता दिली त्याला डोनर आणि ज्याला ती मिळते त्याला डोनी असे म्हणतात.
advertisement
बक्षीसपत्राद्वारे फक्त अस्तित्वात असलेली मालमत्ता देता येते. म्हणजेच जी मालमत्ता प्रत्यक्षात आहे तीच देऊ शकतो. संपूर्ण मालमत्ता देणे आवश्यक नसते. तिचा काही हिस्सा देखील देता येतो.
उदाहरणार्थ, अनेकदा पुनर्विकासाच्या प्रकल्पात नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव यावे म्हणून जुन्या फ्लॅटचा काही हिस्सा मुलांच्या नावावर बक्षीसपत्राने दिला जातो.
बक्षीसपत्रासाठी काय नियम आहेत?
बक्षीसपत्र वैध होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. ते नोंदणीकृत (रजिस्टर) करणे बंधनकारक आहे. डोनरची सही असावी. दोन साक्षीदारांच्या सह्या असणे आवश्यक असतात. तसेच हे 'बक्षीसपत्र मला मान्य आहे'असे लिहून सही करणे गरजेचे आहे.
जंगम मालमत्ता (उदा. दागिने, वाहन इ.) देताना नोंदणीकृत दस्तऐवज किंवा प्रत्यक्ष वस्तूचा ताबा देऊनही बक्षीसपत्र करता येते. तसेच स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
बक्षीसपत्र नोंदणी करताना महाराष्ट्र स्टॅम्प अॅक्टनुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. काही नातेवाईकांमध्ये किंवा निवासी आणि शेतीच्या जमिनीबाबत केलेल्या बक्षीसपत्रावर स्टॅम्प ड्युटीत काही सवलती मिळतात. मात्र काही शहरांमध्ये अतिरिक्त चार्जही लागू शकतो.
बक्षीसपत्र कधी रद्द होऊ शकते?
सामान्य परिस्थितीत बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. फक्त काही अपवादात्मक परिस्थितीतच ते रद्द करता येते. उदा. दस्तऐवजात ठरवलेल्या अटी पूर्ण न झाल्यास रद्द होते. फसवणूक, धमकी किंवा दबावाखाली बक्षीसपत्र केले असल्याचे सिद्ध झाल्यासही बक्षीसपत्र रद्द होऊ शकते.
