महसूल विभाग प्रशासनात काही मोठे बदल झाले आहेत. राज्यातील ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत हे सर्व अधिकारी त्यांच्या बदलीच्या स्थानांवर हजर होतील. त्यांच्या रुजू झाल्याचा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात येत असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरअखेर अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचा दुसरा टप्पा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
सध्या राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच जाहीर झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आवश्यक असलेली उपजिल्हाधिकारी स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी (ERO) पदे रिक्त होती. त्यामुळे आयोगाने सरकारला या रिक्त पदांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली होती.
या निवेदनानंतर महसूल व वन विभागाने ७ नोव्हेंबर रोजी ११२ तहसीलदारांच्या पदोन्नतीचे आदेश जाहीर केले. या निर्णयामुळे निवडणूक आयोगाची अडथळ्यात अडकलेली प्रक्रिया पुन्हा वेगात आली असली तरी, अधिकारी पूर्णपणे हजर होईपर्यंत दुसरा टप्पा जाहीर करणे शक्य नसल्याचे म्हटले जात होते.
जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल कधीपासून?
महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकांचा धुरळा बसल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल ५ डिसेंबरपासून वाजू शकतो, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
