किती टप्प्यांत होणार निवडणूक?
राज्यातील जादा आरक्षणासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदांव्यतिरिक्त, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
advertisement
ज्या जिल्हा परिषदांमध्ये जादा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे, त्या वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतरच घेण्यात येतील, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण विभाग), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (पुणे विभाग) तसेच छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर (छत्रपती संभाजीनगर विभाग) या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
कधीपर्यंत होणार निवडणूक?
याचबरोबर रायगडमधील १५, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग ८, पुणे १३, सातारा ११, सांगली १०, सोलापूर ११, कोल्हापूर ११, छत्रपती संभाजीनगर ९, परभणी ९, धाराशिव ८ आणि लातूरमधील १० अशा एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकाही जिल्हा परिषदांसोबतच १० फेब्रुवारीपूर्वी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
