मुंबई : नवी मुंबईत गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या जोरावर रिअल इस्टेट बाजाराने वेग घेतला असून, सरत्या पाच वर्षांच्या कालावधीत येथील मालमत्तांच्या दरात सुमारे २२ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई–नवी मुंबई अटल सेतू यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे या परिसराचा विकास वेगाने घडत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
२०२० साली नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये सरासरी प्रति चौरस फूट घरांचे दर सुमारे १४ हजार ८०० रुपये इतके होते. मात्र, पायाभूत सुविधा, दळणवळणाची सुधारलेली साधने आणि रोजगाराच्या नव्या संधी यांमुळे मागणी वाढत गेली. परिणामी, सध्याच्या घडीला नवी मुंबईतील सरासरी दर प्रति चौरस फूट सुमारे १८ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, नवी मुंबईचा बदललेला चेहरामोहरा यामागे महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
विशेषतः मुंबई–नवी मुंबई अटल सेतू प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. प्रवासाचा वेळ घटल्याने नवी मुंबईत राहून मुंबईत काम करणे अधिक सोयीचे झाले आहे. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याने भविष्यात या परिसराचे महत्त्व आणखी वाढणार, अशी अपेक्षा घरखरेदीदारांमध्ये दिसून येते. विमानतळामुळे व्यवसाय, लॉजिस्टिक, पर्यटन आणि सेवा क्षेत्रांना चालना मिळणार असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी आधीच नवी मुंबईकडे मोर्चा वळवला आहे.
कोणत्या भागांना सर्वाधिक पसंती?
सर्वेक्षणानुसार, घर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रामुख्याने वाशी, कोपरखैरणे, सीवूड, नेरूळ आणि खारघर या परिसरांना अधिक पसंती दिली आहे. या भागांमध्ये शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मॉल्स आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे कुटुंबांसाठी हे परिसर आकर्षक ठरत आहेत. तसेच नवी मुंबईत माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक, डेटा सेंटर्स आणि कॉर्पोरेट कार्यालयांची संख्या वाढत आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुण वर्गानेही नवी मुंबईत घर घेण्यास प्राधान्य दिल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.
दरवाढीचा वेग पाहता, २०२४ ते २०२५ या एका वर्षाच्या कालावधीतच मालमत्तांच्या किमतींमध्ये सुमारे ४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ बाजारातील स्थिर मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. आगामी काळात विमानतळ सुरू होणे, मेट्रो प्रकल्पांचा विस्तार आणि नव्या व्यावसायिक संकुलांची उभारणी यामुळे नवी मुंबईतील रिअल इस्टेट बाजार अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.
