निफ्टी २५ हजारांवर येईपर्यंत सावध राहा!
'चॉईस ब्रोकिंग'चे रिसर्च ॲनालिस्ट हितेश टेलर यांनी 'मनी कंट्रोल'शी बोलताना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत निफ्टी २५,००० च्या पातळीवर स्थिर होत नाही, तोपर्यंत नवीन मोठी गुंतवणूक करण्यापासून गुंतवणूकदारांनी लांब राहिलेलं बरं. सध्या बाजारात कमालीची अस्थिरता असून भू-राजकीय तणावामुळे परिस्थिती कधीही बदलू शकते.
advertisement
SIP सुरू ठेवणं शहाणपणाचं का?
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, मार्केट पडल्यावर अनेकांना भीतीपोटी एसआयपी थांबवावीशी वाटते. मात्र, मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, जे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहेत, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी असते. जेव्हा मार्केट खाली असतं, तेव्हा तुम्हाला त्याच पैशात म्युच्युअल फंडाचे जास्त 'युनिट्स' मिळतात, ज्याचा फायदा पुढे जाऊन बाजार सावरल्यावर मोठ्या नफ्याच्या स्वरूपात होतो.
शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा इशारा
ज्यांनी पुढच्या ६ महिने किंवा वर्षाभरासाठी पैसे गुंतवले आहेत, त्यांच्यासाठी सध्याची स्थिती थोडी चिंताजनक ठरू शकते. इराण-इस्रायल युद्ध लांबल्यास महागाई वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम मार्केटवर होईल. अशा वेळी ज्या कंपन्यांची फंडामेंटल्स मजबूत आहेत, तिथेच पैसे टिकून राहतील.
आता नक्की काय करावं?
तज्ज्ञांचा साधा आणि सरळ सल्ला आहे: "जे जसं सुरू आहे, तसंच सुरू ठेवा." सध्याच्या परिस्थितीतून पैसे काढून घेऊ नका आणि उगाच जास्त पैसे गुंतवायलाही जाऊ नका. तुमची नियमित एसआयपी सुरू ठेवल्याने तुमच्या घरच्या बजेटवर ताण येणार नाही आणि भविष्यात तुम्हाला 'कम्पाऊंडिंग'चा जबरदस्त फायदा मिळेल.
