पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यात राहणाऱ्या एका गरीब, रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाचे नशीब लॉटरी जिकल्यानं अचानक बदललं, या मजुराला पंजाब स्टेट लॉटरीत 1.5 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले मात्र, आनंद साजरा करण्याऐवजी हे कुटुंब इतके घाबरले की त्यांनी आपले घर सोडले आणि ते गुपचूप गायब झाले.
हे लॉटरी विजेते दाम्पत्य आनंदाऐवजी भीतीपोटी का लपून बसले? याची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे.
advertisement
ही कथा आहे फरीदकोट जिल्ह्यातील सैदेके गावात राहणारे राम सिंह आणि त्यांची पत्नी नसिब कौर यांची. हे दोघेही रोजंदारीवर मजुरी करून आपल्या मुलाचे पोट भरत होते. लॉटरी विक्रेता राजू याने सांगितले की, राम सिंह गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे लॉटरीचे तिकीट खरेदी करत होते.
यावेळी नसिब कौर यांनी केवळ 200 रुपयांचे तिकीट खरेदी करून आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. तिकीट खरेदी करताना नसिब कौर यांनी आपल्या पतीचा फोन नंबर नोंदवला होता.
या दाम्पत्याला आपण करोडपती झालो आहोत, याची कोणतीही कल्पना नव्हती. 6 डिसेंबर रोजी जेव्हा जवळील सादिक शहरातील एका लॉटरी विक्रेत्याला विजेत्यांची यादी मिळाली, तेव्हा त्या यादीत राम सिंह यांचा मोबाईल नंबर होता. लॉटरी लागल्याची बातमी कळाली, तेव्हा राम सिंह राजस्थानमध्ये मजुरीचे काम करत होते आणि त्यांचा फोन बंद होता.
जेव्हा त्यांना ही बातमी मिळाली की ते 1.5 कोटी रुपये जिंकले आहेत, तेव्हा आनंदाने थिरकण्याऐवजी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी लगेच घर गाठले आणि पत्नी नसिब कौर यांना सांगितले की सामान बांधा आणि घर सोडा.
या दाम्पत्याने कुणालाही न सांगता आपल्या मुलासोबत घर सोडले आणि एका अज्ञात ठिकाणी आश्रय घेतला. गावातील लोकांनी जेव्हा त्यांचे घर बंद पाहिलं तेव्हा त्यांनी फोन लावला, पण मोबाईल बंद आढळले, तेव्हा त्यांना चिंता वाटली आणि त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तपासानंतर काही दिवसांनी या कुटुंबाला शोधण्यात यश आले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ते ठिकाण उघड करण्यात आले नाही.
पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना राम सिंह यांनी आपले मनोबल आणि भीती व्यक्त केली. ते म्हणाले "आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती की एवढी मोठी रक्कम जिंकू. ही बातमी कळताच आनंद होण्याऐवजी आम्ही तणाव आणि भीतीखाली आलो," राम सिंह यांनी सांगितले.
त्यांना वाटले की, अचानक करोडपती झाल्याची बातमी पसरल्यास काही लोक त्यांच्याकडून खंडणी मागू शकतात किंवा त्यांना नुकसान पोहोचवू शकतात. याच भीतीने त्यांनी लपून राहण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी राम सिंह आणि नसिब कौर यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. सरकारने अशा परिस्थितीत संपूर्ण मदत करते, हे त्यांना समजावले. पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर हे दाम्पत्य बुधवारी आपल्या घरी परतण्यास तयार झाले. नंतर लॉटरी विक्रेत्याने त्यांना चंदीगड येथे नेले, जिथे त्यांनी विजयी तिकीट जमा केले.
नशिबाने करोडपती बनलेल्या या गरीब दाम्पत्याची ही कथा सिद्ध करते की, अचानक आलेली मोठी संपत्ती काहीवेळा आनंद देण्याऐवजी भीती आणि तणावही निर्माण करू शकते.
