अलवर: राजस्थान पोलिसांनी अलवर येथे मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा भांडाफोड केला आहे. एका टोळीने ‘म्यूल अकाउंट्स’ विकून सायबर गुन्हेगारांना मदत करत होतं. या खात्यांच्या माध्यमातून देशभरातील फसवणुकीची रक्कम फिरवली जात होती आणि ती खपवली जात होती. PTI च्या वृत्तानुसार रविवारी पोलिसांनी 6 जणांना अटक केली. ज्यात Axis Bank च्या 4 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 16 अटक करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अलवरचे एसपी सुधीर चौधरी यांनी दिली.
advertisement
पोलिसांना काय सापडलं?
छापेमारीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पुरावे आणि साहित्य जप्त केले. त्यामध्ये 26 एटीएम कार्ड्स, 33 मोबाईल फोन, 34 सिम कार्ड्स, 2.5 लाख रुपये रोख, चेकबुक, पासबुक आणि 2 कारचा समावेश आहे.
चौकशीत उघड झालं की हे रॅकेट व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप्सच्या माध्यमातून शेकडो करंट आणि कॉर्पोरेट अकाउंट्स सायबर गुन्हेगारांना विकत होतं. ही खाती बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडली जात. नंतर त्यांना नवीन मोबाईल नंबर आणि APK फाइल्सशी जोडून दिलं जात होतं, ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना थेट इंटरनेट बँकिंगपर्यंत प्रवेश मिळत होता. या खात्यांचा वापर ऑनलाइन बेटिंग, गेमिंग स्कॅम आणि क्रिप्टो व्यवहारांमधून आलेले पैसे लपवण्यासाठी व फिरवण्यासाठी केला जात होता.
मास्टरमाईंड आणि Axis Bank कनेक्शन
या प्रकरणात दोन मुख्य आरोपी वरुण पटवा (40) उदयपूरचा रहिवासी सध्या गुरुग्राममध्ये वास्तव, सतीश कुमार जाट (35) हिसार, हरियाणा येथील रहिवासी यांच्यासह Axis Bank चे 4 कर्मचारी अटक झाले आहेत. ज्यात साहिल अग्रवाल (33), गुलशन पंजाबी (33), आसू शर्मा (23), अंचल जाट (24) यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या मते, हे बँक कर्मचारी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट करंट अकाउंट्स उघडून ते मध्यस्थांना देत होते. हे मध्यस्थी पुढे ती खाती सायबर गुन्हेगारांना विकत होते.
रॅकेटचा व्याप
-पोलिस तपासानुसार हा साधा फसवणूक प्रकरण नव्हता, तर मोठ्या प्रमाणावर चाललेला ऑपरेशन होता.
-या म्यूल अकाउंट्समधून 500 कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत.
-4,000 हून अधिक तक्रारी नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) वर नोंदल्या आहेत.
-आतापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त फसवणुक थेट या रॅकेटशी जोडलेली आढळली आहे.
म्यूल अकाउंट्स का धोकादायक असतात?
सायबर फसवणुकीच्या जगात ‘म्यूल अकाउंट्स’ हे सर्वात मोठं हत्यार मानलं जातं. या खात्यांमधून चोरीचा पैसा काही काळासाठी फिरवला जातो, ज्यामुळे खरे गुन्हेगारापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होतं. जेव्हा बँकेचे कर्मचारीच अशी खाती उघडण्यात मदत करतात, तेव्हा आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर स्कॅम चालवण्यासाठी संपूर्ण नेटवर्क तयार होतं.