महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा असेल तर...
नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आवाज उठवत झाकून ठेवलेल्या पुतळ्याचं अनावर केलं होतं. आता, महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन, असं अमित ठाकरे गुन्हा दाखल झाल्यावर म्हणाले आहे.
advertisement
शिवयारांच्या पुतळ्यावर अमित ठाकरे काय म्हणाले होते?
महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त “लोकार्पणासाठी नेता मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला होता.
या चार महिन्यांत विमानतळासाठी, दहीहंडी, दिवाळी, दसरा सगळ्या कार्यक्रमांना नेते पोहोचले. मग आपल्या स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला त्यांना एक तासही मिळाला नाही का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला होता.
निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणारे यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणं ही आमची जबाबदारी होती, आणि आम्ही ती पार पाडली. त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजेसह नवी मुंबईकरांसाठी दर्शनाकरिता खुला असेल, असे आम्ही जाहीर करतो. ही लढाई इथेच थांबणार नाही. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कुठेही झाला, तर मनसे त्याला थेट उत्तर देईल. आम्ही कोणाला घाबरणारे नाही, आणि शिवरायांसाठी तर अजिबात नाही, असं अमित ठाकरे म्हणाले होते.
