पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आत्मनिर्भर भारत' योजनेतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 4 जी तंत्रज्ञानावर आधारित सेवेचे लोकार्पण ओडिशा, झारसुगुडा येथे झाले. यामध्ये भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) 92 हजार 633 टॉवर्सचा समावेश आहे. त्यापैकी 9 हजार 20 टॉवर्स महाराष्ट्रात आहेत. येरवडा येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल, बीएसएनएलचे सरव्यवस्थापक हरिंदर कुमार आणि दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल उपस्थित होते.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशभरातील नागरिकांपर्यंत 4 जी तंत्रज्ञान पोहोचवणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील 1100 ऑनलाइन सेवा गावागावांत पोहोचवण्यासाठी या कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होईल. नागरिकांना त्यांच्या अर्जाची संपूर्ण माहिती मिळेल आणि सेवांसाठी तक्रारी नोंदवता येतील. हे तंत्रज्ञान सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बीएसएनएल आता नफ्यात असून, स्वदेशी 4 जी तंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे वाटचाल सुरू आहे. ही यशोगाथा उल्लेखनीय ठरेल. गावांच्या विकासासाठी फक्त रस्तेच नाहीत, तर कनेक्टिव्हिटी देखील तितकीच महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. इंटरनेटमुळे आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग आणि बाजाराशी संबंधित माहिती गावात सहज पोहोचते. स्मार्ट व्हिलेजमुळे गावातील व्यवस्थेत सुधारणा होते, पारदर्शकता येते आणि तंत्रज्ञानामुळे भेदभाव कमी होतो. एकूणच या उपक्रमांमुळे नागरिकांना सोप्या आणि जलद पद्धतीने सरकारी सेवा मिळतील, गावांचा विकास होईल आणि डिजिटल युगात नागरिकांचा सहभाग वाढेल.