परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द केला जाऊ शकतो. रस्ते सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या नव्या नियमांनुसार, वाहन परवाना रद्द करण्याचा अधिकार आरटीओ किंवा जिल्हा परिवहन कार्यालयाला देण्यात आला आहे. मात्र, परवाना रद्द करण्याआधी संबंधित वाहनचालकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
advertisement
कधी पासून अंमलबजावणी होणार सुरु?
या नियमाचे अधिकृत नोटिफिकेशन बुधवारी जारी करण्यात आले असून 1 जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता नियम मोडल्यानंतर फक्त दंड भरून मोकळे होता येणार नाही. त्यामुळे वाहनचालकांना लहान-मोठे सर्व वाहतूक नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक ठरणार आहे.
यातील एक विशेष गोष्ट म्हणजे ही कारवाई एका वर्षाच्या कालावधीत पाच वेळा नियम मोडणाऱ्यांवरच केली जाणार आहे. समजा, एखाद्याने एका वर्षात चार वेळा नियम मोडले आणि पुढील वर्ष सुरू झाले तर मोजणी पुन्हा नव्याने सुरू होईल.
अपघात टाळण्यासाठी सरकारचा कडक निर्णय
नवीन नियमांमध्ये वाहन चोरी, प्रवाशांवर हल्ला, अपहरण, अतिवेग, ओव्हरलोडिंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे आणि सिग्नल तोडणे यांसारख्या छोट्या चुकांचाही समावेश करण्यात आला आहे. किरकोळ निष्काळजीपणामुळे मोठे अपघात होऊ शकतात हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
