मोठी स्वप्नं घेऊन मुंबईत आला पण...
नमन अग्रवाल असं या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा राजस्थान राज्यातील रहिवासी होता. नमन आयआयटी बॉम्बेमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी मोठी स्वप्ने घेऊन तो मुंबईत आला होता, मात्र त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नमन अभ्यासात हुशार असल्याचे त्याच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले आहे.
advertisement
हॉस्टेलच्या छतावरून उडी
सदर धक्कादायक घटना पवईतील आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये असलेल्या हॉस्टेल क्रमांक 4 मध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नमनने हॉस्टेलच्या छतावरून उडी मारून स्वतःचे जीवन संपवलं. ही घटना घडताच तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी मोठा आवाज ऐकला आणि धाव घेतली. त्यांनी तातडीने आयआयटी प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
अपघाती मृत्यूची नोंद केली
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून नमनला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी सध्या 'एडीआर' म्हणजेच अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नमनने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे ठोस कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आता नमनचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे.
