दादर रेल्वे स्टेशनच्या जवळच असलेल्या या कबुतरखान्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. येणारे-जाणारे लोक कबुतरांना खाद्य टाकतात. हे खाद्य आणि कबुतरांची विष्ठा यामुळे परिसरात दुर्गंधी देखील पसरते. याशिवाय, अलीकडच्या काळात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून हा कबुतरखाना हटवण्याची मागणी होत होती. सार्वजनिक आरोग्याचा व वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्याचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखाना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांचे काही गट पुढे आले आहेत.
advertisement
मुंबई: आरेतील आदिवासींचं अस्तित्व धोक्यात, प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नोटीसा
शुक्रवारी रात्री महापालिकेचं पथक कबुतरखाना हटवण्यासाठी गेलं होतं. या पथकाने कबुतरखान्यातील पत्रे, पिंजरे आणि इतर साहित्य हटवण्यास सुरुवात केली. मात्र, काही वेळातच स्थानिकांनी विरोध करत घोषणाबाजी केली आणि कारवाई थांबवण्याची मागणी केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
महापालिकेच्या पथकाने कबुतरखान्यातील काही गोष्टी हटवल्या आहेत. मात्र, संपूर्ण कबुतरखाना तोडण्यात आलेला नाही. सध्या तिथे एक पिंजरा शिल्लक आहे. आता महापालिकेची पुढील कारवाई कधी होणार आणि ती कोणत्या पद्धतीने पार पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.