'ठाकरेंनी मराठीचा आग्रह धरला, पण ठाकरेंची मुलं बॉम्बे स्कॉटीशमध्ये गेली', या वारंवार होत असलेल्या आरोपांवरही आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'मगाचपासून आपण कोणत्या भाषेत बोलत आहोत? मला एक शब्द सांगा, ज्यात मी इंग्रजी भाषेत बोललो आहे. आपण सगळं अस्खलित मराठीमध्येच बोलत आहोत ना? आमच्या घरचं वातावरणही मराठीच असतं', असं आदित्य ठाकरे म्हणाले.
advertisement
'नुसती देशातली नाही, नुसती आशिया खंडातली नाही, तर जगातली एकमेव मुंबई महापालिका असेल, जिथे आम्ही मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये आयबी बोर्ड, आयसीएसई बोर्ड, आयजीसीएसई बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि एसएससी बोर्ड हे सगळं आणलं. जिथे त्या शाळांना गळती लागली होती, तिथे 10 हजार अर्ज आले, 4 हजार जागांसाठी. आम्हाला ऑनलाईन लॉटरी काढावी लागली', असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
'ज्या शिक्षण पद्धतीमध्ये मी जाऊ शकलो आणि शिकू शकलो, माझं हेच स्वप्न होतं जे मी पूर्ण करून दाखवलं. दुर्दैवाने हे लोक ते बंद पाडत आहेत, पण मी सत्तेत येऊन पुन्हा ते सुरू करेन. सगळ्यात चांगल्या शिक्षण पद्धतीचा चॉईस हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण मुंबई महापालिकेच्या शाळेत मोफत दिला पाहिजे, हे आम्ही करून दाखवलं होतं आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा करणार', असं आश्वासनही आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.