मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. सहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, सर्वात जास्त चर्चा रंगली ती 'जी-उत्तर' (दादर-माहीम) प्रभागाची. या प्रभागात मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात थेट लढत होणार असे चित्र असतानाच ऐनवेळी ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने मनसेचे यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निमित्ताने 'ठाकरे बंधू' (उद्धव आणि राज ठाकरे) राजकीय स्तरावर पुन्हा एकत्र आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
advertisement
जी-उत्तर प्रभाग समितीत मनसेच्या यशवंत किल्लेदार यांच्या विरोधात ठाकरे (उबाठा) गटाने जोसेफ कोळी यांना मैदानात उतरवले होते. दादर-माहीम हा दोन्ही पक्षांचा बालेकिल्ला असल्याने ही लढत अटीतटीची होईल, असा अंदाज होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या 15 मिनिटांत नाट्यमय घडामोडी घडल्या. 'मातोश्री'वरून आलेल्या आदेशानंतर जोसेफ कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे किल्लेदार यांचा मार्ग मोकळा झाला आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
सहा प्रभागांमध्ये नवे कारभारी
मुंबईतील इतर पाच प्रभागांमध्येही विरोधकांनी उमेदवार न दिल्याने केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी होते. आज झालेल्या निवडणुकीनंतर पुढील नगरसेवक अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत
- एच-पूर्व/पश्चिम: रोहिणी कांबळे (शिवसेना उबाठा)
- जी-दक्षिण: पद्मजा चेंबूरकर (शिवसेना उबाठा)
- के-पश्चिम: रोहन राठोड (भाजपा)
- के-दक्षिण/के-उत्तर: प्रकाश मुसळे (भाजपा)
- पी-दक्षिण: श्रीकला पिल्ले (भाजपा)
- जी-उत्तर: यशवंत किल्लेदार (मनसे)
नाराजी दूर?
आजच्या निवडणुकीत भाजपला 3, शिवसेना (उबाठा) गटाला 2 आणि मनसेला 1 जागा मिळाली आहे. मात्र, लक्षवेधी ठरली ती जी-उत्तर प्रभागात शिवसेनेने मनसेला दिलेली साथ ... मराठी भाषा आणि मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त एकत्र आलेले ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये महापालिका निवडणुकीनंतर काहीशी नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज झालेल्या निवडणुकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
