औज तालुका दक्षिण सोलापूर येथील उझेब पाटील यांनी सुमारे पाच एकर क्षेत्रामध्ये शेततळे तयार करून मत्स्यपालनाला सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात शेततळे तयार करण्यासाठी आणि आवश्यक सुविधा उभारण्यासाठी जवळपास 80 ते 90 लाख रुपयांपर्यंत खर्च आला. त्यानंतर त्यांनी रुपचंद आणि फंगस या जातींच्या माशांची पिल्ले तळ्यामध्ये सोडली.
advertisement
माशांच्या संगोपनासाठी शेततळ्यात फिश फूड तसेच तांदूळ टाकले जातात. यामुळे माशांची वाढ चांगली होते. विशेष म्हणजे शेततळ्यातील पाणी शेतीसाठीही वापरले जात असल्याने पाण्याचा दुहेरी फायदा मिळत आहे. रुपचंद आणि फंगस जातींचे मासे साधारणपणे 9 महिन्यांत विक्रीसाठी तयार होतात. मासे तयार झाल्यानंतर व्यापारी थेट शेततळ्यावर येऊन खरेदी करतात. या माशांना बाजारात 80 ते 120 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. पुणे, मुंबई आणि हैदराबाद येथील व्यापारीही या माशांची खरेदी करत असल्यामुळे चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या मत्स्यपालन व्यवसायामध्ये एकूण एक कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामामुळे खर्च वजा जाता उझेब पाटील यांना तब्बल 60 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता शेती व व्यवसायामध्ये संधी शोधाव्यात, असे आवाहन उझेब पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मत्स्यपालनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.





