मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा! २ लाखापर्यंत मिळणार लाभ
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
राज्यातील बळीराजा ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता, ती घोषणा अखेर राज्य सरकारने शुक्रवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली.
मुंबई : राज्यातील बळीराजा ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता. ती घोषणा अखेर राज्य सरकारने शुक्रवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. या कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. राज्याच्या आर्थिक विकासासोबतच शेतकरी आणि ग्रामीण भागाला बळ देण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे.
30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत मिळणार कर्जमाफी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी जाहीर करत आहे, असे ते म्हणाले.
advertisement
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश
शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Gopinath Munde शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या निर्णयामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांनाही आर्थिक संरक्षण मिळणार असून ग्रामीण कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
कृषी जीडीपी वाढवण्याचे मोठे उद्दिष्ट
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने दीर्घकालीन लक्ष्य निश्चित केले आहे. राज्याचा कृषी जीडीपी सन २०४७ पर्यंत ५५ अब्ज डॉलरवरून तब्बल ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी १० ते १५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक व्यवस्था
शेतकऱ्यांना विविध शासकीय सेवा सुलभपणे मिळाव्यात यासाठी डिजिटल प्रणाली मजबूत करण्यावरही सरकारचा भर आहे. महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकात्मिक डिजिटल परिसंस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती, अनुदान आणि इतर सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 2:53 PM IST







