पुनर्वसनाच्या कामासोबतच प्रीमियम टॉवरची उभारणी
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या तिन्ही भागांतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम दोन टप्प्यांत होत आहे. त्यापैकी वरळी भागात 121 चाळीत राहणाऱ्या 9689 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी 40 मजली एकूण 34 इमारती उभारल्या जात आहेत. या बांधकामानंतर म्हाडाला विक्रीयोग्य घरे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध झाली आहे.
advertisement
85 मजल्यांच्या भव्य इमारती
म्हाडाने येथे एकूण पाच गगनचुंबी इमारतींची योजना तयार केली आहे. दोन टॉवर 58 मजली असतील. त्यामध्ये 1 बेसमेंट, 8 मजले पोडियम, 1 ई-डेक आणि 48 मजले निवासासाठी असणार आहेत. या टॉवरांची उंची सुमारे 192 मीटर असेल. उर्वरित तीन टॉवर 85 मजली असतील. यात 1 बेसमेंट, 8 मजले पोडियम, 76 मजले आलिशान फ्लॅट असतील. भव्य इमारतींची उंची तब्बल 300 मीटर असेल, ज्यामुळे ते मुंबईतील उंच इमारतींच्या यादीत अग्रस्थानी येतील.
सी फेसिंग फ्लॅट्स, क्लब हाऊस, पूल आणि स्पा
या सर्व टॉवरांमध्ये मुंबईतील उच्चभ्रू निवासी प्रकल्पांप्रमाणे आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. यामध्ये स्विमिंग पूल, अत्याधुनिक जिम, स्पा आणि क्लब हाऊस, मिनी थिएटर, सर्व फ्लॅटना बाल्कनी, सी फेस व्हिव्ह देणारी फ्लॅटची रचना, जोड फ्लॅट घेण्याचा पर्याय असेल. तसेच प्रत्येक फ्लॅटसाठी दोन स्वतंत्र पार्किंग देण्यात आली आहे. या सर्व सुविधांमुळे हे प्रकल्प मुंबईतील प्रीमियम रिअल इस्टेटमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवतील.
लॉटरीत उपलब्ध होणार तब्बल 3333 घरे
पाचही टॉवरांमध्ये एकूण 3333 घरे म्हाडाला विक्रीसाठी मिळतील.
घरे उच्च उत्पन्न गटासाठी असतील
उपलब्ध प्रकार : 2 बीएचके आणि 3 बीएचके
क्षेत्रफळ : 1200 ते 1500 चौ. फूट
सध्या वरळी परिसरातील प्रति चौरस फूट दर 1.25 लाख रुपये असूनही, म्हाडा ही घरे 60 ते 62 हजार रुपये प्रति चौ. फूट या तुलनेने कमी किमतीत देणार आहे. त्यामुळे ही घरे बाजारात मोठ्या वेगाने विकली जातील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पातील एका फ्लॅटची किंमत सुमारे 8 ते 10 कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे.
पुनर्विकासामुळे बदलणार वरळीचे स्वरूप
वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामुळे या परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. पुनर्वसन इमारतींसोबत प्रीमियम टॉवर उभारल्याने हा सारा भाग उच्चभ्रू निवासी पट्ट्यात परिवर्तित होणार आहे. जुन्या चाळ संस्कृतीच्या जागी आधुनिक, संरचनात्मकदृष्ट्या मजबूत आणि आलिशान निवासगृहे उभारली जाणार आहेत.






