मुंबई महापालिका निवडणुकीत अगदी पानवाल्यापासून वडापाववाल्यापर्यंत, माथाडी कामगारापासून घरकाम करणाऱ्या महिलेपर्यंत, शिक्षकांपासून निवृत्त कर्मचाऱ्यापर्यंत असे सगळेच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. संबंधित उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. यात काही उमेदवार कोट्यधीश आहेत, तर काहीचं हातावर पोट आहे.
यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारामध्ये एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे. त्याने आपला व्यवसाय भिक्षा मागणं असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. तसेच आपल्याकडे ५० हजार रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे. एका वडापाव विक्रेत्याने आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांची संपत्ती चक्क १ कोटी रुपयांहून अधिक आहे.
advertisement
एक माथाडी कामगार देखील निवडणूक लढवत आहे. त्याने आपली संपत्ती २६ लाखांची असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. याशिवाय बस चालक, पोस्टमन, दूध विक्रेता, आशा कार्यकर्त्या, ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिला, चहा विक्रेते, ऑटो चालक, डबेवाले, शिक्षक, शिंपी आणि रोजंदारीवर काम करणारे मजूरही यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
या निवडणुकीत ६५० उमेदवारांनी आपण व्यावसायिक असल्याचं म्हटलं आहे. ज्यांचा व्यवसाय केबल ऑपरेटर, इंटरनेट कॅफे, ट्रॅव्हल फर्म्स किंवा मसाल्याची दुकानं चालवतात. याव्यतिरिक्त ४०० पेक्षा जास्त गृहिणी आणि १०० वकील निवडणुकीच्या मैदानात आहेत.
यातील बहुतांश उमेदवार कोणत्याही मुख्य प्रवाहातील पक्षाचा पाठिंबा नसताना अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यातील बऱ्याच जणांना सत्तेत येण्यासाठी निवडणूक लढवायची नाहीये. तर आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सुधारण्याची प्रबळ इच्छा असल्याने हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकीकडे धनशक्ती असलेले उमेदवार असताना दुसरीकडे असे विविध लहान व्यवसाय करणारे उमेदवारही मैदानात उतरल्याने यंदाची निवडणूक वैविध्यपूर्ण ठरत आहे.
