मुख्य समस्या काय?
एल्फिन्स्टन पूल हा मध्य व पश्चिम मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल होता. तो बंद झाल्याने संपूर्ण भार इतर पुलांवर पडतो आहे. टिळक पूल, करी रोड पूल आणि चिंचपोकळी पूल यांचा वापर नागरिक करत आहेत, पण हे रस्ते आधीच गर्दीने भरलेले असल्याने अडचण अधिक वाढली आहे. करी रोड पूलवर वेळेनुसार एकमार्गी वाहतूक ठेवली आहे. सकाळी एका बाजूला तर दुपारनंतर उलट बाजूला वाहतूक सुरू केली जाते. त्यामुळे प्रवाशांना गोंधळ होतो. हा प्रश्न झाला नेहमी रहदारी किंवा कामानिमित्त वाहतूक करणाऱ्यांचा, पण या परिसरात मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि या वाहतूक कोंडीची झळ त्यांनाही पोहोचते. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयाकडे जाणाऱ्या गाड्या आणि रुग्णवाहिकांनाही उशीर होतो आहे. रुग्ण 15 मिनिटांचा प्रवास आता जवळपास तासभरात करत आहेत.
advertisement
Mumbai Traffic: एल्फिन्स्टन पूल बंद, मुंबईत वाहतूक कोंडीचे संकट, पोलिसांनी जाहीर केले पर्यायी मार्ग
बस सेवेत बदल
एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यामुळे काही BEST बस मार्ग वळवले आहेत. बस क्रमांक 188, ए-197 आणि 101 या बस आता प्रभादेवी पुलाऐवजी इतर रस्त्यांवरून धावत आहेत. त्यामुळे बसने जाणाऱ्या प्रवाशांनाही जास्त वेळ लागत आहे.
नागरिकांची नाराजी
भवानी शंकर रोडवर दोन तास अडकून बसल्याची तक्रार सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी केली आहे. “कोंडी प्रचंड आहे, पण रस्त्यावर पोलीस दिसत नाहीत,” असे त्यांनी म्हटले. या व अशा प्रकारच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी नोंदवल्या आहेत.
एकंदरीत एल्फिन्स्टन पूल तोडकामामुळे बंद झाल्यापासून होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मुंबईकरांना अपेक्षा आहे की पोलिसांनी पर्यायी रस्त्यांवर अधिक काटेकोर नियंत्रण ठेवावे, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांसाठी विशेष सोय करावी आणि बस मार्गावरील बदल अधिक स्पष्टपणे प्रवाशांपर्यंत पोहोचवावेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एल्फिन्स्टन पूलच्या जागी होणारे नवीन बांधकाम आणि शिवडी-वरळी जोडरस्ता प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत, जेणेकरून नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुकर होईल.