मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण मुंबईकरांना आता त्यांच्याच शहरात निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्यासाठी एक नवं पर्यटन स्थळ लवकर सुरु होणार आहे. नेमके हे उद्यान आहे कुठे आणि कधी सुरु होणार, चला तर मग या बाबत सविस्तर जाणून घेऊयात
मुंबईकरांसाठी नवं पर्यटन स्थळ
advertisement
मुंबईकरांसाठी नवं पर्यटन स्थळ म्हणजे कांदळवन उद्यान जे गोराईमध्ये उभारण्यात आलेले आहे. या कांदळवन उद्यानाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि डिसेंबर महिन्यात हे उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीने तब्बल 30 कोटी रुपये खर्च केले आहेत.
या उद्यानाची नेमकी खासियत काय?
गोराईतील उद्यानात सुमारे 800 मीटर लांबीचा उंच लाकडी मार्ग तयार करण्यात आला आहे, ज्यावरून पर्यटकांना कांदळवन आणि किनारी निसर्गाचा जवळून अनुभव घेता येणार आहे. मुंबईकरांना शहराच्या गोंगाटातही निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवण्याची नवी संधी मिळणार आहे.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांना रोजगारही मिळणार आहे. उद्यानाची देखभाल आणि पर्यटन व्यवस्थापनासाठी स्थानिकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगारनिर्मितीही होणार आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प 2019 मध्ये मंजूर केला होता. दोन वर्षांनंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि बोरिवलीजवळील गोराई खाडीजवळ हे उद्यान भारण्यात आलं आहे. . कांदळवन आणि किनारी परिसंस्थेतील जैवविविधतेबद्दल जनजागृती निर्माण करणे हा या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आहे.
उद्यानात 'नेचर इंटरप्रिटेशन सेंटर'ही उभारण्यात आलं आहे. या दोन मजली इमारतीत ग्रंथालय, कार्यशाळा कक्ष, माहिती केंद्र आणि ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष अशा सुविधा असतील. येथे पर्यटक आणि विद्यार्थ्यांना निसर्गशास्त्र, पर्यावरण आणि जैवविविधतेविषयी माहिती मिळू शकेल. या प्रकल्पामुळे उत्तर मुंबईतील हरित क्षेत्रात वाढ होणार असून, निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने गोराई कांदळवन उद्यान एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे
